प्रेमाच्या नात्यात गुंफलेली दोन बहिणींची गोष्ट – “काव्यांजली – सखी सावली”
कलर्स मराठीवर २९ मे पासून सोम ते शनि रात्री ८.३० वा. !

मुंबई २३ मे, २०२३ : फुलातून सुगंध आणि गुळातून गोडी वेगळी करता येईल का ? नाही ना? अशीच एकरूपता असावी नात्यात किंवा मैत्रीत. जिव्हाळा, प्रेम, आदर महत्वाचा जो नात्याचा पाया असतो. काही नाती रक्ताची असतात तर काही सहवासाने जोडली जातात. आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात, पण ती प्रेमाने जपणारी, त्याचा मान ठेवणारी लोकं तशी कमीच बघायला मिळतात. नातेसंबंधाची विण घट्ट होते ती आपुलकीने, प्रेमाने आणि एकमेकांना मिळालेल्या साथीने. पण काही नाती अशी असतात जी आपल्यासोबत कायम राहावी असं वाटतं असतं. त्यांची साथ आपल्याला धीर देऊन जाते. आई – मुलाचं, दोन भावांचं नातं किंवा सख्या बहिणींचे नाते किती घट्ट आहे, किती प्रेम आहे हे आपण नेहमीच ऐकले आहे. पण काही नाही रक्ताची असून देखील त्यांच्यात दुरावा असतो आणि काही दूरची असून देखील हृदयाच्या अगदी जवळ असतात ज्यांना आपण आपल्या जिवा सारखं जपतो.

आपल्या काव्या आणि अंजलीचं असंच आहे आहे बरं का ! असं कोणी लिहून ठेवलं आहे का की सख्याच बहिणी मध्ये जिव्हाळ्याच नातं असतं ? काव्या आणि अंजली या सख्या बहिणी नसल्या तरीदेखील प्रेमाच्या धाग्यात गुंफलेल्या नात्याच्या घट्ट वीणेने त्यांना एकमेकींशी बांधून ठेवलं आहे. त्यांच्यातील दृढ विश्वास आणि नितांत प्रेम हे कधीच कमी झालं नाही. या दोघींचं नातं कसं आहे ? कसं आहे या बहिणींचं विश्व ? समोर आलेल्या अडचणींना कश्या त्या मिळून सामोऱ्या जातात ? काय आहे या काव्यांजलीची गोष्ट नक्की बघा कलर्स मराठीवर २९ मे पासून सोम ते शनि रात्री ८.३० वा. पर्पल मॉर्निंग मुव्हीज निर्मित “काव्यांजली” – सखी सावली मालिकेमध्ये काव्या प्रेभुदेसाईची भूमिका कश्मीरा कुलकर्णी तर अंजली दिवेकर ची भूमिका प्राप्ती रेडकर साकारणार आहे.

ते म्हणतात ना दोन व्यक्तींमधील प्रेम जर घट्ट असेल तर नियती पण त्यांना वेगळं करू शकत नाही कारण त्या नशिबाने एकेमकांशी बांधलेल्या असतात. एकेमकांच्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या – वाईट गोष्टींचे, घटनांचे पडसाद हे दोघांच्याही आयुष्यात उमटत असतात. मग ते नातं अगदी रक्ताचे असो वा दोन जिवलग मैत्रिणींचे असो वा बहिणींचे असो… ‘काव्यांजली’ अश्याच एकमेकींवर प्रेम करणाऱ्या दोन जिवाभावाच्या बहिणींची गोष्ट आहे. या दोघी चुलत बहिणी असल्या तरीदेखील त्यांचं नातं आई – मुलीसारखं आहे. अंजलीचा जन्म झाल्यापासून ती काव्याची मानसकन्या झाली. काव्याचं लग्न झाल्यावर अंजलीने घराची जबाबदारी उचलली. काव्या सासरी सगळ्या जबाबदाऱ्या अगदी चोख निभावते आहे, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

पण, नवऱ्याच्या प्रेमासाठी, त्याच्याकडून मिळणाऱ्या थोड्या मानासाठी आसुसली आहे. ते आज न उद्या तिला मिळेल, या आशेवर ती जगतेय. अंजलीचं ठरलं आहे तिला विश्वजित सारखा नवरा नको आहे, ज्याला कुठेतरी काव्या देखील समर्थन देत आहे. या दोन बहिणींच्या आयुष्यात पुढे काय लिहून ठेवले आहे ? अंजलीला तिच्या स्वप्नांचा राजकुमार मिळेल ? काव्या अंजलीसाठी योग्य मुलगा शोधू शकेल? काव्या तिचा मान सासरी मिळवू शकेल ? विश्वजित काव्याला आपलंस करेल ? हे आपल्याला कळेलच.

यानिमित्ताने बोलताना व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी, (वायकॉम18) – अनिकेत जोशी म्हणाले, “नात्याचे बंध, त्यातील गोडवा, आपुलकी हे आता कुठेतरी हरवत चाललं आहे. सध्य परिस्थिती बघता आपल्याला आपल्या आई – वडिल, भावंडं यांच्याशी बोलायला देखील वेळ नाहीये. वास्तविक सुख हे आपल्या माणसांमध्येच लपलेलं आहे हे आपण विसरलो आहे. हे सुख खरंतर ते दडलयं आपल्या माणसात, त्यांच्या आनंदात. काव्या आणि अंजली या दोघी बहिणींचे एकमेकींवर जीवापाड प्रेम आहेच पण त्या कुटुंबाला देखील धरून आहेत. टेलिव्हिजन माध्यमाद्वारे आणि आमच्या मालिकांद्वारे आम्ही नेहेमीच संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो.

काव्यांजली मालिका रसिक प्रेक्षकांच्या घरातला आरसा आहे आणि त्यांचं प्रतिबिंब त्यांना या मालिकेत बघता येईल अशी हि मालिका आहे. २९ मे पासून मालिकांच्या वेळेत देखील बदल करण्यात आले आहेत, आम्हांला अशा आहे रसिकांचे प्रेम तसेच कायम राहील.”

Leave a Reply