मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाची “मनमौजी” गोष्ट

 

मुलगी किंवा बायका न आवडणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात एक नाही, तर चक्क दोन तरुणी येतात आणि त्या तरुणाचं काय होतं याची धमाल, मनोरंजक गोष्ट ‘मनमौजी’ (Manmauji Marathi Movie) या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च नुकताच करण्यात आला असून, आतापर्यंत पोस्टर आणि टीजरमध्ये दिसलेल्या फ्रेशनेसमुळे चित्रपटाविषयी आधीच असलेलं कुतुहल आता आणखी वाढलं आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला “मनमौजी” (Manmauji Marathi Movie) हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

गुलाबजाम, लॉस्ट अँड फाऊंड अशा चित्रपटांची निर्मिती केलेल्या गोल्डन गेट मोशन पिक्चर्सच्या विनोद मलगेवार यांनी “मनमौजी”(Manmauji Marathi Movie) चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शीतल शेट्टी यांचे असून हृषिकेश जोशी यांनी संवाद लेखन केले आहे. प्रसाद भेंडे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. क्षितिज पटवर्धन आणि वलय मुळगुंद यांनी गीतलेखन, अमितराज आणि पंकज पडघन यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

 

चित्रपटात अभिनेता भूषण पाटील अभिनेत्री सायली संजीव, सिनेसृष्टीत प्रथमच पदार्पण करणारी रिया नलावडे, जयवंत वाडकर, अरुण नलावडे, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओज ह्या चित्रपटाचे वितरक म्हणून काम पाहणार आहेत तर कार्यकारी निर्माता म्हणून संदीप काळे यांनी काम पाहिले आहे.

 

मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात दोन तरुणी येतात, त्यानंतर या तरुणाचे मुलींविषयीचे विचार बदलतात का? त्याचं प्रेम जडतं का? अशा आशयसूत्रावर “मनमौजी” हा चित्रपट बेतला आहे. प्रेमकथेशिवाय कथेला अनेक भावनिक पदर असल्याचंही आपल्या ट्रेलरमधून पाहायला मिळतं.

उत्तम कलाकार, रंजक गोष्ट, नेत्रसुखद लोकेशन्स, श्रवणीय संगीत याचा मिलाफ “मनमौजी” चित्रपटातून नक्कीच अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर निश्चितच प्रॉमिसिंग आहे. म्हणून “मनमौजी” अनुभव घेण्यासाठी आता ८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात जावंच लागणार यात शंका नाही.

Leave a Reply